अशोक सराफ (Ashok Saraf) यांचा जन्म ४ जून १९४७ रोजी मुंबई येथे झाला. दक्षिण मुंबईतील चिखलवाडी येथे त्यांचे बालपण गेले. अशोक सराफ हे मुळचे बेळगावचे आहेत.
अशोक सराफ (Ashok Saraf): ‘ययाती आणि देवयानी’ पासून अभिनयाची सुरुवात
त्यांनी शालेय शिक्षण मुंबईतील डी.डी.टी विद्यालयातून पूर्ण केले. अशोक सराफ (Ashok Saraf) यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड.वयाच्या आठराव्या वर्षी त्यांनी शिरवाडकर यांच्या ‘ययाती आणि देवयानी’ या नाटकातील विदुशकाच्या भुमिकेतून व्यावसायीक रंगभुमिवर आपल्या अभिनयाची सुरुवात केली. काही संगीत नाटकांतून देखील त्यांनी भुमिका केल्या. त्यांनी १० वर्षे बँकेत नोकरी केली. मात्र त्याठिकाणी त्यांचे मन रमले नाही. नोकरीत कमी आणि नाटकात जास्त वेळ ते काम करायचे. गजानन जहागीरदार यांच्या ‘दोन्ही घरचा पाहुना’ या चित्रपटात त्यांनी छोटीशी भुमिका केली. त्यानंतर दादा कोंडके यांच्या ‘पांडु हावलदार’ मधील पोलिसाची भुमिका साकारली.
अशोक सराफ : मराठी चित्रपट सृष्टीतील ‘मामा’,विनोदी आणि गंभीर अभिनेता
मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वांचे आवडते आणि लाडके ‘मामा’ म्हणजे अभिनेते अशोक सराफ(Ashok Saraf). उत्कृष्ट अभिनय, सहज विनोद प्रवृत्ती, चेहऱ्यावरील कमालीचे हावभाव, विनोदाची अचूक वेळ याच्या जोरावर अभिनेते अशोक सराफ यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. तब्बल ५० वर्षे ते आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. नाटक, मराठीसोबतच अनेक हिंदी मालिका आणि चित्रपट असा अशोक सराफ यांचा अभिनय क्षेत्रातील प्रवास राहिला आहे. नाटकातूनच त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. अशोक सराफ यांनी फक्त विनोदीच नाही तर गंभीर स्वरुपापासून ते खलनायकापर्यंच्या अनेक भूमिका साकारल्या आहेत. १९६९ साली ‘जानकी’ या मराठी चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. त्यांनी २५० पेक्षा जास्त मराठी चित्रपटात काम केले. त्यातील १०० चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी झाले.
‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘गंमत जंमत’, ‘अशी ही बनवाबनवी‘, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘कुंकू’, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘एक गडी बाकी अनाडी’, ‘वजीर’ यांसारख्या प्रमुख चित्रपटात त्यांनी काम केले. त्यांचे हे चित्रपट खूप गाजले. अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बर्डे यांची जोडी सुद्धा खूप गाजली. या जोडीने केलेल बहुतेक चित्रपट हे सुपरहीट ठरले. अशोक सराफ यांच्या ‘अशी ही बनवा बनवी’ या चित्रपटाला खूप यश मिळाले.
त्याचसोबत त्यांनी महेश कोठारे आणि सचिन पिळगावकर यांच्यासोबत काम केले. अशोक सराफ यांना त्यांच्या अभिनयासाठी आतापर्यंत फिल्मफेअर पुरस्कार, महाराष्ट्र शासन पुरस्कार, महाराष्ट्र राज्य नाट्य पुरस्कार, झी गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. मराठीसोबतच अनेक हिंदी चित्रपटात अशोक सराफ यांनी काम केले. अशोक सराफ यांनी बॉलिवूडमधील अनेक चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारल्या. ‘सिंघम’, ‘प्यार किया तो डरना क्या’, ‘कुछ तुम कहो कुछ हम कहे’, ‘बेटी नं. वन’, ‘जोरु का गुलाम’, ‘गुप्त’, ‘कोयला’, ‘येस बॉस’ आणि ‘करण अर्जुन’ या चित्रपटात चांगल्या आणि लक्षात राहतील अशा भूमिका त्यांनी साकारल्या.
मराठी आणि हिंदी चित्रपटांसोबतच अशोक सराफ यांची अनेक नाटके आणि मलिका गाजल्या. ‘हम पांच’ या हिंदी मलिकेतील त्यांची आनंद माथुरची भूमिका खूप गाजली. ‘डोन्ट वरी हो जाएगा’, ‘छोटी बडी बातें’ यांसारख्या हिंदी मालिकांमध्ये देखील त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या.
अशोक सराफ (Ashok Saraf)यांनी अभिनेत्री निवेदिता जोशी यांच्यासोबत लग्न केले. अशोक सराफ यांना अनिकेत हा एकुलता एक मुलगा आहे. त्यांनी स्वत:चे प्रॉडक्शन हाऊस ‘अनिकेत टेलीफिल्म्स’ या नावाने सुरु केले. या प्रॉडक्शन हाऊसच्या माध्यमातून त्यांनी ‘टन टना टन’ ही मराठी मालिका आणि काही हिंदी मालिका तयार केल्या. या मालिका सुद्धा खूप गाजल्या.
लेखक-पद्माकर