उषा नाईक (Usha Naik) या मुळच्या बेळगावच्या परंतु पुढे त्यांनी आपली कारकीर्द ही मराठी चित्रपटसृष्टीमध्ये घडवली. त्यांनी नृत्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेल होत. पण कोल्हापुर भागात प्रसिध्द असलेले लावणीनृत्य येत नसल्यामुळे अपमानित झालेल्या उषा नाईक (Usha Naik) तो प्रकार शिकण्यासाठी बेळगावहून कोल्हापूरला स्थायिक झाल्या. लावणी शिकल्यावर घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे वडिलांना मदत करण्यासाठी त्यांनी चित्रपटात काम करायला सुरुवात केली. ‘पाच रंगांची पाखरे’ हा त्यांचा पहिला चित्रपट. त्यानंतर ‘बन्याबापू’, ‘भैरू पैलवान की जय’, ‘घरजावई’, ‘दोन बायका फजिती ऐका’, ‘हळदीकुंकू’, ‘कलावंतीण’, ‘वेध’, ‘रिक्षावाली’, ‘महागणपती’, असे एकापेक्षा एक सरस चित्रपट त्या करत गेल्या. १९८८ सालचा ‘राखणदार’ हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतला मैलाचा दगड ठरला. त्यानंतर त्यांची ‘उत्कृष्ट अभिनेत्री’ म्हणून दखल घेतली गेली. केवळ मराठीतच नव्हे तर कन्नड, ओडिसी आणि हिंदी अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी नृत्यांगना म्हणूनही काम केलं आहे. इतकंच नव्हे तर ‘लावणी रंगली रंगात’सारखा सांगीतिक कार्यक्रम आणि ‘सती महानंदा’, ‘जंगली कबुतर’सारख्या नाटकांतही त्यांनी काम केलं आहे. त्यानंतर त्या थांबल्या नाहीत. तर मालिकांकडेदेखील वळल्या. आजी साकारण्याचं वय नसतानाही ‘स्वप्नांच्या पलीकडे’ या मालिकेत त्यांनी आजीची भूमिका साकारली. तीदेखील खूप गाजली. आता ‘एक हजाराची नोट’ या चित्रपटांतही त्या आजीची भूमिका साकारत आहेत. एकाच वेळी सात्त्विक आणि शृंगारिक भूमिकांत चपखल बसणा-या उषा नाईक (Usha Naik) यांचं हेच वैशिष्टय आहे.
अभिनयाची म्हणण्यापेक्षा नृत्याची आवड त्यांनरा लहानपणापासूनच होती. लहानपणीच भरतनाटयम, कथ्थक शिकले होते. नृत्य केवळ आवड म्हणूनच शिकलेले.. पुढे हाच त्यांचा व्यवसाय होईल याची त्यांनाही कल्पनाच नव्हती. शास्त्रीय नृत्याच्या आधारावर लावणी शिकण्याच्या हेतूने त्या कोल्हापुरात आल्या तेव्हा त्या वयाने लहान होत्या. त्यावेळी अरुण सरनाईक गोवा आणि आसपासच्या भागात संगीत नाटकं खूप करायचे. त्यांचा बेळगावचा संगीत नाटकांचा एक ग्रुप होता. त्यांना उषा (Usha Naik) चांगलं नृत्य करते, याची त्या ग्रुपला कल्पना होती. भालजी पेंढारकरांची दुसरी पत्नी लीला चंद्रगिरी आणि त्यांची चुलत बहीण बेबी चंद्रगिरी या दोघी बहिणी संगीत नाटकाशी संबंधित होत्या आणि सरनाईकांच्या अगदी जवळच्या होत्या. कोल्हापूरच्या एका कार्यक्रमासाठी त्या दोघींनी उषा (Usha Naik) यांच नाव सुचवलं होतं. त्या कार्यक्रमात त्यांना लावणी सादर करायला सांगितली. लावणी त्यांना अजिबात येत नव्हती. मुळात मराठी गाण्यांवर नृत्य सादर केलं जातं, हेच त्यांना माहीत नव्हतं. त्यामुळे त्यांना नाचता येत नाही म्हणून तेव्हाचे वादक वैतागून उठून निघून गेले. कर्नाटकाच्या धारवाड-हुबळीपयत उषा नाईक (Usha Naik) यांची नृत्यांगना म्हणून चांगली ओळख निर्माण झाली होती. हा त्यांचा झालेला अपमान त्यांच्या खूप मनाला लागला. ही गोष्ट त्यांच्या मनाला खूप लागली. काहीही करून हे लावणी नृत्य शिकायचंच यासाठी त्या आई-वडिलांच्या खूप मागे लागल्या. कोल्हापुरात ते खूप सादर केलं जायचं म्हणून ते शिकण्यासाठी त्या कोल्हापूरला आल्या. खरं म्हणजे आता व्यवसाय म्हणून शिकवले जातात, तसे नृत्याचे वर्ग त्या काळी नव्हतेच. तो काळ ब्लॅक अँड व्हाइटचा उत्तरार्ध होता. हळूहळू मराठी चित्रपटात ग्रुप डान्समध्ये नाचू लागले. केवळ नृत्य हा एकच ध्यास त्यांनी घेतला होता. जे काही शिक्षण झालं होतं तेवढय़ावरच ते सोडून त्यांनी स्वत:ला या कामात झोकून दिलं. त्यांना या कामातून थोडे पैसेही मिळत होते. त्यामुळे घरच्यांनाही थोडा हातभार लागत होता. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यमुळे घरच्यांनीही त्यांना काही विरोध केला नाही.
त्यांना या चित्रपटसृष्टीत कुणीही गॉडफादर नव्हत्ग़ तसंच कोणतीही कौटुंबिक किंवा सामाजिक पार्श्वभूमी नाही. केवळ त्या नृत्याच्या शिदोरीवर या क्षेत्रात आल्या. त्यावेळी त्यांना’हळदीकुंकू’सारखा चित्रपट मिळाला. ही भूमिका मिळणं त्याांच्यासाठी सोपं नव्हतं. निर्माता आणि दिग्दर्शक यांचे बरेच वाद झाले मात्र त्यातही त्यांच नाव पुढे आलं आणि तो चित्रपट त्यांना मिळाला. नंतर ‘कलावंतीण’ नावाचा चित्रपट मिळाला, त्यातलं ‘पिकल्या पानाचा..’ हे गाणं खूपच गाजलं. त्या गाण्यासाठी त्यांना ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’चा पुरस्कार मिळाला. ‘हळदीकुंकू’सारखा साहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवून देणारा चित्रपटही मिळाला. त्यानंतर मात्र जवळजवळ सहा महिने कोणताच चित्रपट मिळाला नाही. त्यावेळी मराठीत चित्रपटात मिळणारं मानधन आणि घरची परिस्थिती याचा ताळमेळ बसत नव्हता. शिवाय घरगुती जबाबदा-या होत्या. त्यामुळे येणारा चित्रपट करायचा, असं मनोमन त्यांनी ठरवलं होतं. त्यामुळे जी मिळेल ती भूमिका मग ती प्रथम दर्जाची असो वा दुय्यम दर्जाची असो, त्या स्वीकारत गेल्या\ पण मला जी भूमिका मिळायची ती चांगलीच असायची. ‘राणीने डाव जिंकला’ या चित्रपटात प्रिया तेंडुलकर मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत होती. आणि यांची भूमिका तिच्या मैत्रिणीची होती. त्यांच्यासोबत निळुभाऊ होते. तसंच ‘माळावरचं फूल’ यातही प्रियाच मुख्य अभिनेत्री होती आणि उषा नाईक (Usha Naik) यांना दुय्यम भूमिका होती, पण या दोन्ही भूमिका दुय्यम असल्या तरीही लक्षात राहाण्याजोग्या होत्या. अलका कुबलबरोबर तर अशा अनेक भूमिका केल्या आहेत. आवर्जून सांगण्यासारखं उदाहरण म्हणजे ‘नवसाचं फूल’ या चित्रपटातील खलनायिकेची भूमिका. त्या नेहमीच चांगल्या भूमिका वाटय़ाला आल्याने कोणतीही भूमिका करताना कधी आवडी-निवडीला प्राधान्य दिलं नाही. त्या करत गेल्या त्यावेळी काम करत राहणं ही माझी गरज होती. म्हणून अनेक लहान-मोठया भूमिका केल्या. पण त्याचं कधीच त्यांना वाईट वाटलं नाही.
लेखक-पद्माकर